रक्षाबंधन
हिंदू सण / From Wikipedia, the free encyclopedia
रक्षाबंधन[1] हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.[2]
रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ "संरक्षण, बंधन किंवा काळजी" असा होतो. बहीण-भावाचा हा सण, ज्याचा उगम लोक-संस्कृतीमध्ये झाला, त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती; काही ठिकाणी सलुनो,[3] [4] सिलोनो,[5] आणि राकरी असे म्हटले जात होते.[6]
विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशांमध्ये किंवा गावांमध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक तिच्या विवाहित घरी जात नाहीत.[7]
उत्तर भारतातील ग्रामीण भागांत जिथे अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तिथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात.[8][9] त्यांचे भाऊ, जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात, कधीकधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यांपूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात.[10] भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात.[11]
शहरी भारतात, जिथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत, तिथे हा सण अधिक प्रतीकात्मक बनला असला तरीही तो खूप लोकप्रिय आहे. या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपारिक प्रदेशांच्या पलीकडे पसरले आहेत. तंत्रज्ञान, स्थलांतर,[12] चित्रपट,[13] सामाजिक संवाद, [14] आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे[15][16] या सणाचे स्वरूप बदलले जात आहे.[17]
रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे,[18] तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे.[19]