वल्लभभाई पटेल
भारतीय स्वातंत्र्य सेनानीने संयुक्तरीत्या भारत तयार केला / From Wikipedia, the free encyclopedia
वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ आॕक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते.
संक्षिप्त सूची | |
पूर्ण नाव | वल्लभभाई पटेल |
जीवनकाळ | ऑक्टोबर ३१, १८७५ (नडियाद, खेडा जिल्हा, गुजरात) ते डिसेंबर १५, १९५० |
आई-वडील | लाडबा व झवेरभाई |
पत्नी | झवेरबा |
शिक्षण | बॅरिस्टर |
धर्म | हिंदू |
कार्यषेत्र | राजकारण |
गौरव | 'भारताचे लोहपुरुष', 'सरदार' |
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.